शिवचरित्रमाला - भाग १६ - हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे

महाराष्ट्राच्या हिंदवी स्वराज्यावर प्राणांतिक संकट येत असलेले पाहून भारतातील कोणकोण राजांच्या मदतीकरता येणार होतेराजपूत जाट बुंदेले गढवाल डोग्राशीख कोणीही नाही. जे काही करायचं होतं ते राजांना आपल्या साध्यासुध्या गरीब मावळ्यांच्या जिवावरच करायचं होतं. साधी सहानुभूतीसुद्धा मिळण्याची वानवा होती. पण राजांचा पूर्ण विश्वास होता याआपल्या भावांवर आणि भवानीवर. 

दरमजल खान फौजेनिशी पुढे 
सरकत होता. महाराजांना धामिर्क भावनेने चिडविण्याचा आणि सह्यादीतून मोकळ्या मैदानावर काढण्याचा डाव पूर्णपणे फसला. वासरू जसं गाईपासून दूर जात नाही. तसंच महाराजांचं प्रेम सह्यादीच्या गडकोट दऱ्याखोऱ्यांवर होतं. ते त्याला बिलगून होते. 

याचवेळी दिल्लीत बादशाह बनलेला 
औरंगजेब काय विचार करीत होता हा दख्खनचा आखाडा त्याला दिसत होता. तो शिवाजीराजांवरही भयंकर चिडलेला होता आणि अफझलखानाशीही म्हणजेच विजापूरच्या आदिलशाहीशीही त्याचं शत्रूत्त्वच होतं. त्याने साधा सरळ विचार केला की आपले हे दोन्हीही शत्रूच आहेत. आदिलशाह आणि सीवा. हे दोघेही आपसांत झुंझणार आहेत. यातील जो कोणी शिल्लक उरेल त्याच्याविरुद्ध नंतर आपण पाहू काय करायचं ते! बहुतेक उरणार अफझलखान. शिवाजी संपणार. हरगीज संपणार! 

गोव्याचे पोर्तुगीजही अलिप्तच राहिले. 
जंजिऱ्याच्या सिद्दीची हौस मराठी राज्य कोकणातून मुरगाळून काढण्याचीच होती. पण यावेळी महाराजांच्या विरुद्ध फार मोठी गडबड करण्याची कुवत त्याच्यात नव्हती. जी गडबड थोडीफार सिद्दीने केली ती महाराजांच्या मराठी सरदारांनीउधळून लावली. सिद्दी गप्प बसला. 

आता सरळसरळ डाव होता 
अफझलखान विरुद्ध शिवाजीराजे. शिवाजी डोंगरातून बाहेर पडत नाही हे खानाला दिसून आले तरी तो प्रयत्न करीत होता. वाईत आल्या आल्या (इ. स. १६५९ मे)त्याने स्वराज्याच्या पूर्व कडेवर असलेली चार ठाणी सात हजार फौज पाठवून एकदम जिंकली. ठाणी अगदीच लष्करी बाबतीत लहानशी होती. शिरवळ सासवड सुपे आणि पुणे. 

या 
झडपेचा मराठी रयतेवर नक्कीच दहशती परिणाम होईल. लोक घाबरतील आपल्याकडे येऊन सामील होतील अशी त्याची अपेक्षा होती. या दहशतीच्या जोडीला लोकांना धनदौलतीचे आमिष दाखविले तर ही खेडवळ मावळी माणसं नक्कीच आपल्या पायाशी येतील अशी खानाला खात्री वाटली. त्याने मावळच्या देशमुख सरदारांना आदिलशाहीच्या शिक्कामोर्तबीची फर्माने पाठविली. त्या फर्मानात शाहने या सरदारांना फर्मावले होते की , ' शिवाजीची बाजू सोडा आणिनामजाद सरदार अफझलखान यांस सामील व्हा. जर सामील झालांत तर तुमचं कोटकल्याण करू. पण जर शिवाजीच्याच बाजूला राहून बादशाहीविरुद्ध वागलांत तर तुमचा साफ फडशा उडवू. याद राखा! आम्ही शिवाजाचा मुळासकट फडशा पाडणार आहोत '! 

हे असलं भयंकर 
जरबेचं पण तेवढंच गोड आमिषाचं फर्मान महाराजांच्या सर्व मावळीसरदारांना खानानं पाठविले. पहिलंच फर्मान वाईपासून अवघ्या पाच कोसावर असलेल्या कान्होजी नाईक जेधे यांना मिळालं. कान्होजी नाईक ते फर्मान घेऊनच राजगडावर शिवाजीमहाराजांकडे आले. आपल्या पाचही तरुण पुत्रांसह आले आणि त्यांनी महाराजांनाआभाळाएवढ्या विश्वासानं सांगितले की , ' आपण अजिबात चिंता करू नका. मावळच्या सर्व सरदारांच्यानिशी मी तुमच्या पायाशी आहे. मी माझ्या घरादाराव पाणी सोडतो. 

केवढा 
प्रचंड विश्वास हा! आणि कान्होजींनी मावळच्या सर्व देशमुखांना सांगाती घेऊन महाराजांकडेच धाव घेतली. फक्त उतवळीकर खंडोजी देशमुख हा एकमेव सरदार आधीच अफझलखानाला जाऊन मिळाला होता. बाकीचे सर्व जिवलग स्वराज्याच्या झेंड्याखाली! 

खानाला वाटलं होतं की 
लाचार भित्र्या भिकाऱ्यासारखे हे मावळे माझ्या छावणीत सेवा करायला येतील. त्याची पूर्ण निराशा झाली. तरीही त्याने एक गंमत केली. या शिवशाही सरदारांच्या घरात नव्या पिढीतील पोरं होती. कुणाचा मुलगा कुणाचा पुतण्या कुणाचा भाऊइत्यादी या तरुण पोरांच्या नावानं. खानानं नवी अशीच आमिषाची फर्मानं पाठविली. पण एकही पोरगा खानाला जाऊन मिळाला नाही. सारं स्वराज्यच महाराजांच्या पाठीशी खडं झालं. 

महाराजांनी हे निर्माण केलं. 
आजच्या भाषेत त्याला म्हणतात राष्ट्रीय चारित्र्य. राष्ट्रीय निष्ठा. हे जर आपल्यापाशी असेल तर आपण शत्रूचे पॅटन रणगाडे ही उलथून पाडू शकतो. कान्होजींसारखे परमवीर अब्दुल हमीद आमच्यात तळपू शकतात. आमच्या आकांक्षांचे झेंडे गगनात चढू शकतात.