मम सुखाची ठेव! Mam Sukhachi Thev

महाराष्ट्राचे हे लाडके व्यक्तिमत्त्व ३५ वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील आचरे गावात आपल्या ‘मैत्र जिवाचे’ अशा ७० कलावंतांना घेऊन माहेरपणाला गेले होते. त्यात होते- दस्तुरखुद्द पु. ल. देशपांडे, सुनीताबाई, कुमार गंधर्व, वसुंधरा कोमकली, मालिनी राजूरकर, गोविंदराव पटवर्धन, नारायण पंडित, अशोक रानडे, एम. आर. आचरेकर, चिंचाळकर गुरुजी आदी मंडळी. पुलंचे ते माहेरपण म्हणजे आगळेवेगळे गंधर्व संमेलनच होते.
त्याची ही आठवण!
त्या १९७६ सालच्या आचरे गावच्या रामनवमीच्या दिवसाचे सारे वातावरणच ‘पुलमय’ होऊन गेले होते. पुलं आणि त्यांच्या परिवाराचा आचरे येथील सुखद सहवास आम्हा आचरेवासीयांच्या दृष्टीने ‘मर्मबंधातील ठेव’ ठरली होती, की जी आम्ही अजूनपर्यंत जपून ठेवली आहे. आज ३५ वर्षे झाली तरी त्या आठवणी मोगऱ्याच्या कळ्यांप्रमाणे टवटवीत आहेत.
त्याचे असे झाले, एके दिवशी आचरे गावचे सुपुत्र, पु.ल. देशपांडे यांचे स्नेही आणि सुप्रसिद्ध तबलापटू वसंतराव आचरेकर यांचे रामेश्वर देवस्थानचे तत्कालीन ट्रस्टी बाळासाहेब गुरव यांना एक पत्र आले. ‘या वर्षी रामेश्वर मंदिराचा त्रिशतसांवत्सारिक महोत्सव येत आहे. त्यानिमित्त पु.ल. देशपांडे, सुनीता वहिनी, कुमार गंधर्व आणि त्यांचा ७० जणांचा गोतावळा आचरे येथे मागारपणाला येत आहे. आपण रामनवमी उत्सवात गायन, वादनकला, साहित्य यांचे छोटेखानी संमेलनच भरवू.’

त्या पत्रातील प्रत्येक अक्षराने बाळासाहेब गुरवांसोबत अख्खे आचरे गाव आनंदून गेले. माझ्या वडीलबंधूंनी- दादा ठाकूर यांनी- ही बातमी घरी सांगितल्यावर आम्हीही मंतरून गेलो. चिपळूणहून निघणारे एक ‘सागर’ नियतकालिक सोडले तर अन्य गावागावांत पोहोचणारे त्या वेळी स्थानिक वृत्तपत्र नव्हते, पण पु.ल. देशपांडे आचरे गावी येणार आणि चक्क आठ दिवस मुक्कामाला राहणार, ही सुवार्ता ‘रानारानात गेली बाई शीळ’ करीत गावागावांत, घराघरांत पोहोचली. पुलं सुनीताबाईंसोबत धामापूर मुक्कामी येऊन जायचेच, पण आचरे गावी आठ दिवस पुलं परिवाराचा मुक्काम हा सर्वासाठीच ‘महाप्रसाद’ होता.

आणि.. ज्या सोनियाच्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहात होतो, तो दिवस उजाडला. रामनवमी उत्सव चालू असतानाच कोल्हापूरमार्गे व्हाया कणकवली, रामगड, श्रावण करीत धुळीचे रस्ते अक्षरश: तुडवत तुडवत तीनचार जीपगाडय़ा, दोन मॅटेडोर आदी वाहनांनी पु.ल. देशपांडे आणि त्यांचा गोतावळा आचरे येथे डेरेदाखल झाला. एक एक नक्षत्र पायउतार होत होते. आपल्या गावी त्या काळी नसलेल्या कोणत्याही भौतिक सुविधांनी ओशाळून न जाता स्वत: वसंतराव आचरेकर खांद्यावरील हातरुमाल सावरत सर्वाना उतरून घेत होते- ‘‘येवा, आचरा आपला आसा.’’
त्यात होते पु.ल. देशपांडे, सुनीता देशपांडे, कुमार गंधर्व, वसुंधरा कोमकली, मालिनी राजूरकर, गोविंदराव पटवर्धन, नारायण पंडित, अतुल व्यास, रत्नाकर व्यास, मुंबई विद्यापीठाचे त्या वेळचे संगीत विभागाचे प्रमुख अशोक रानडे, थोर साहित्यिक अरविंद मंगळूकर, शरच्चंद्र चिरमुले, बंडुभैय्या चौगुले, राम पुजारी, इंदूरचे नटवर्य बाबा डिके, इंदोरचे पत्रकार राहुल देव, बारपुते, थोर चित्रकार एम.आर. आचरेकर, चिंचाळकर गुरुजी, भार्गवराम पांगे आदी ६०-७० मंडळी आचरे गावी अवतीर्ण होत होती आणि आचरे गावचे नभांगण ताऱ्यांनी भरभरून जात होते.

पाडव्यापासून सुरू होणारे रामनवमी उत्सवाचे दिवस.. दुपारची वेळ.. रामेश्वर सभामंडपात महिरपी कनातीही गाऊ लागल्या होत्या. वाळ्याचे पडदे वातावरण सुगंधित करीत होते. सभामंडपातील हंडी झुंबरात दुपारचे सूर्यकिरण लोलकासारखे भासत होते. दरबारात रामेश्वर संस्थानचे त्या वेळचे वयोवृद्ध ख्याल गायक साळुंकेबुवांचा ‘पुरिया धनश्री’ ऐन बहरात आला होता. त्याच धूपदीप वातावरणात ‘पुरिया धनश्री’च्या पाश्र्वसंगीतावर आचरे गावचे ज्येष्ठ नागरिक अण्णा फोंडकेकाका, पु.ल. देशपांडेंच्या हाती मानाचा नारळ देऊन त्यांचे हात आपल्या हाती घेऊन पुलंना रामेश्वराच्या सभामंडपात आणत होते. पुलंच्या मागून महाराष्ट्राचा साहित्य, संगीत, चित्र-शिल्पकलेचा अक्षरश: ‘शाही सरंजाम’ पायी चालत येत होता. त्या माजघरातील शाही स्वागताने ‘भाईंचे’ डोळे पाणावून गेल्याचे आम्ही अगदी जवळून पाहिले.
त्या वेळी रामेश्वर मंदिराच्या परिसरात कोणत्याही अत्याधुनिक सोडाच, पण अत्यावश्यक सुविधाही उपलब्ध नव्हत्या. ‘पु.ल. देशपांडे आपल्या घरी राहतील का?’ ‘सुनीताबाई अ‍ॅडजेस्ट करून घेतील का?’ या विचारांनी देवस्थानचे विश्वस्थ बाळासाहेब तथा अण्णा गुरव थोडे धास्तावलेच होते. त्या मंडळींसाठी स्वतंत्र व्यवस्था म्हणजे त्यांचा शेजारचा अक्षरश: मांगर. तो त्यांनी माडाच्या झापांनी शाकारून सजवला होता. जमीन शेणाने सारवून रांगोळ्या काढल्या होत्या. गाद्या, उशा, खुच्र्या वसंतराव आचरेकरांनी कोल्हापूरहून आणल्या होत्या. आठ दिवसांसाठी सर्व तऱ्हेच्या भाज्या आणि सोबत यल्लप्पा आचारीदेखील कोल्हापूरहून आणला होता. पुलंच्या मागारपणाची जशी जमेल तशी तयारी केली होती.
वास्तूला शोभा त्याच्या स्थापत्यरचनेपेक्षा त्यात कोणाचे वास्तव्य, यावरच खरी अवलंबून! पुलं, सुनीताबाई, कुमार गंधर्व, एम.आर. आचरेकर आदी रत्नजडित ६०-७० जवाहीर त्या मांगरवजा कुटीत राहायला आले आणि त्या पर्णकुटीचा क्षणार्धात कसा ‘राजमहाल’ झाला, तो आम्ही याची डोळा पाहिला. अख्खे गुरव कुटुंबच त्यांच्या तैनातीला होते. सुनीताबाई, वसुंधरा कोमकली गुरवाच्या घरच्या सुनाच झाल्या होत्या. पुलंची दंगामस्ती बघायला आम्ही आमचाही तळ आमच्या घराकडून गुरवांच्या घरी हलवला होता. एकदा काही पत्रकारांनी सुनीताबाईंना गुरवांच्या घरी तांदूळ निवडताना पाहून प्रश्न केला, ‘‘तुम्ही तांदूळ निवडता?’’ त्या वेळी सुनीताबाई म्हणाल्या, ‘‘हो आम्ही जेवतोसुद्धा!’’ आणि कुमारांपासून गोविंदराव पटवर्धनांपर्यंत सर्व हास्यकल्लोळात बुडाले!

त्या पर्णकुटीत पुलं आपल्या विविध प्रवासवर्णनातील किस्से सांगत. तो तर वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकेल. अगदी लहान मूल आजोळी जसे दंगामस्ती करते तसे पुलं आपले वय विसरून वागायचे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘‘अरे वसंता, काल मी पु.ल. देशपांडे होतो रे! आज मी पुलं आचरेकर झालो.’’ दुपारी, संध्याकाळी रामेश्वर मंडपात कुमारांच्या मैफिली रंगायच्या! प्रारंभी मालिनी राजूरकर, वसुंधरा कोमकली, नारायण पंडित यांचे गायन व्हायचे. नंतर सतारवादन, संतूरवादन, त्यानंतर कुमारजी अवतीर्ण व्हायचे!

भार्गवराम तथा दादा पांगे ध्वनी संयोजनाची जबाबदारी घ्यायचे. तबल्यावर वसंतराव आचरेकर, हार्मोनिअमवर गोविंदराव पटवर्धन, तानपुऱ्यावर वसुंधरा कोमकली आणि निवेदनाची जबाबदारी स्वत: पुलं देशपांडे यांनी घेतलेली आणि रंगत म्हणजे त्या कार्यक्रमाची जिवंत चित्रे पांढऱ्या शुभ्र ड्रॉईंग पेपरवर स्वत: एम.आर. आचरेकर चितारीत असत. कुमारांची ‘तान’ ते लीलया पेन्सिलने त्या ड्राईंग पेपरवर सहज उतरवत. सुरुवातीला त्या रेषा अगदी शेवयासारख्या वाटत, पण क्षणार्धात ‘गायनाच्या बैठकीचा आकार’ घेत. ही जादू एम.आर. आचरेकर या प्रचंड व्यक्तिमत्त्वाच्या महान कलाकाराच्या अगदी जवळ बसून बघण्याचे भाग्य आम्हाला लाभले.

कुमारांच्या ख्याल गायनानंतर पुलंचे निवेदन होई. त्यानंतर कुमारजींची निर्गुण भजने सुरू व्हायची. इंदूर, देवासच्या कलाकारांसोबत आचरेवासीय कलावंतांनाही ती भजने डोलवत ठेवायची! एके दिवशी तर बहारच आली. दुपारी मालिनी राजूरकरांपासून कुमार गंधर्वापर्यंत सर्वानी वसंत, भीमपलासी, तोडी, गुजुरीतोडी, मुलतानीतोडी आदी रागदारी गायकीने चैत्रातील त्या दुपारला मोगऱ्याचा गंध दिला. खऱ्या अर्थाने वसंतोत्सव रंगला!
..आणि त्याच सायंकाळी पुलंचा एक आगळा पैलू आम्ही पाहिला! हार्मोनिअमची स्वर्गीय जुगलबंदी! अगदी आमच्या माजघरात बसून ऐकतो आहे, अशी! स्वर्गीय जुगलबंदीसाठी पुलंसोबत तेवढय़ाच तोलामोलाचे संवादिनीचे बादशहा होते गोविंदराव पटवर्धन! तबल्यावर वसंतराव आचरेकर आणि जुगलबंदीसाठी उभयतांनी नाटय़संगीत निवडले होत- ‘सकुल तारक सुता’. जुगलबंदी जवळजवळ पाऊण तास चालली होती. उभयतांची बोटे सुरांवरून लीलया फिरत होती आणि स्वरांचे ‘महाल’ सभामंडपात आकारात होते. त्याकाळी आम्हा कोणाजवळच ‘टेपरेकॉर्डर’सारखे साधे उपकरणही उपलब्ध नव्हते. तो स्वर्गीय ठेवा अजूनपर्यंत फक्त आम्ही कानात आणि मनात जपून ठेवला आहे.. अगदी अत्तराच्या फायासारखा! चिरंतन! आणि चिरंजीव!

आचरे गावचे सुपुत्र गंगाधर आचरेकर यांच्या ‘भारतीय संगीत’ या संगीतावर लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा, त्यावेळी अध्यक्षपदावरून झालेले पुलंचे अभ्यासपूर्ण भाषण, आचरी यल्लप्पाचा झालेला सत्कार! यल्लप्पाचा गौरव करताना गहिवरून आलेला पुलंचा कंठ आणि भरून आलेले यल्लप्पाचे डोळे आमच्या नजरेसमोर अजूनही आहेत. त्या कार्यक्रमाची गंमत काही औरच होती. चर्चा, परिसंवाद, मैफल, पुस्तक प्रकाशन सोहळा, ग्रंथपाल काका दळवी यांचा पुलं देशपांडे यांनी केलेला गौरव, गुरवांच्या मांगरात चालणारी पुलं व परिवाराची दंगा-मस्ती हे सारे आम्हाला अगदी जवळून पाहता आले. पुलंचे ते मागारपण म्हणजे आमच्या दृष्टीने आगळेवेगळे गंधर्व संमेलनच होते.

असा हा आगळावेगळा, आमच्या गावात येऊन आचरेकर झालेला ‘गंधर्व’ १२ जून २००० रोजी सर्वाना सोडून गेला. त्यानंतर या अशा वलयांकित व्यक्तींना अगदी जवळून पाहिल्याचे, अनुभवल्याचे आम्ही सर्वाना सांगत राहिलो. त्या प्रसंगाची दुर्मीळ छायाचित्रे दाखवून आमची ही श्रीमंती इतरांना वाटत राहिलो. त्या पुलकित दिवसांच्या आणि त्यांच्या गोतावळ्याच्या आगळ्या मागारपणाच्या आठवणीचा स्वर्गीय ठेवा आम्ही गावक ऱ्यांनी जपून ठेवला आहे, ‘मम सुखाची ठेव’ म्हणून!

सुरेश शामराव ठाकूर
लोकसत्ता,
रविवार १२ जून २०११